Surajkund Mela 2019

हस्तकलेच्या प्रदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर  सुप्रसिद्ध असलेल्या हरियाणातील "सुरजकुंड मेळा 2019"मध्ये यंदा थीम स्टेट म्हणून महाराष्ट्र राज्याचा सहभाग असणार आहे... यानिमित्ताने महाराष्ट्राची कला, संस्कृती, इतिहास, खाद्य संस्कृती देश-विदेशातील पर्यटकांच्या समोर सादर केल्या जाणार असून सुरजकुंडच्या ऐतिहासिक परिसरात यंदा स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला आणि पेशवाईतील शनिवार वाडा उभारला जाणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या मेळ्याचे उदघाटन केले जाणार आहे.

हरियाणा राज्य पर्यटन विभाग आणि सुरजकुंड मेळा समिती तर्फे 1987 पासून सुरजकुंड मेळा भरवण्यात येतो. दरवर्षी एका राज्याला थीम स्टेटचा दर्जा देऊनs त्या राज्याची ओळख जगाला करून दिली जाते. यंदा पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय आणि एमटीडीसीच्या प्रयत्नातून महाराष्ट्राला या मेळ्यात थीम स्टेट होण्याची संधी मिळाली आहे. यंदा 1 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी सुरू होणारा हा 33वा आंतरराष्ट्रीय सुरजकुंड मेळा आहे.

या मेळाव्याच्या निमित्ताने देशभरातील हस्तकलांचे प्रदर्शन एकाच ठिकाणी होईल. देशभरातले हस्तकला कारागीर, देशविदेशातील व्यापारी पर्यटक यात सहभागी होतील. गेल्या वर्षी या मेळ्याला देश जग भरातील 8 लाख लोकांनी भेट दिली होती. यंदा ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

थीम स्टेट महाराष्ट्र असेल म्हणजे काय...?
30 एकरच्या परिसरात होणाऱ्या सुरजकुंड मेळात  यंदा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी राहिलेल्या रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली जाणार आहे. तसेच, मेळ्यातील दिल्ली गेट दिशेला पेशवाई संस्कृती दर्शवणारा शनिवार वाडा उभारला जातो आहे. या व्यतिरिक्त मेळा परिसरात शिवकालीन किल्ले, लोकसंस्कृती दाखवण्याची व्यवस्था केली गेली आहे. महाराष्ट्राची पारंपरिक कला, संगीत, लोककला, संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतील  कोकणी, मालवणी, वर्हाडी, खान्देशी, पुणेरी खाद्यसंस्कृतीतील पुरणपोळी, थालीपीठ, मुंबईचा वडापाव आदी खाद्यपदार्थाची मेजवानी पर्यटकांना चाखता येणार आहे. राज्यातील कलाकारांना आपले कलागुण सादर करता येतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील हस्तकला कारागिरांना आपली कला सादर करण्याची, वस्तू विक्री करण्याची मोफत  व्यवस्था करण्यात आली आहे.

या मेळाव्यामुळे महाराष्ट्राची लोकसंस्कृती, पर्यटन, इतिहास जगासमोर मांडला जाईल. महाराष्ट्राकडे जगभरातले पर्यटक आकृष्ठ होतील. महाराष्ट्राच्या हस्तकला कारागिरांना रोजगार उपलब्ध होईल. जगाच्या बाजारपेठेत महाराष्ट्र पोहचेल अशी अपेक्षा महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे.

सुरजकुंडचा इतिहास....
दक्षिण दिल्लीपासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या या जागेचे सौंदर्य महत्व ओळखून राजा सुरजपालने इथे आपला गड बांधला. सुर्यमंदिर आणि सूर्य सरोवरची स्थापना केली. आता मंदिर अस्तित्वात नाही. पण सूर्य सरोवरचे अवशेष आहे. यालाच सुरजकुंड म्हणून ओळखले जाते. या सुरजकुंडचा भवताली हा मेळा 1987 पासून भरवला जातो आहे. जगभरातले पर्यटकांसाठी हस्तकला प्रेमींसाठी हा मेळा म्हणजे पर्वणी असते....

Comments